ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञान क्षेत्र महत्त्वाचं’ ‘कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकास व वापराबाबत भर देणार’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जनसंघर्ष न्यूज नेटवर्क

मुंबईः- (दि.२८)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई टेक इंट्राप्रिनियर असोसिएशन’द्वारे जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित आशिया खंडातील सर्वात मोठ्या कुत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रदर्शन असलेल्या ‘मुंबई टेक वीक २०२५’ कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांची ‘गव्हर्निंग द फ्युचर : एआय अँड पब्लिक पॉलिसी’ या विषयावर लोकमत माध्यम समूहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचे भविष्यातील रोडमॅप आणि राज्य सरकारच्या तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.

महाराष्ट्र हे सुशासनाच्या बाबतीत देशात सर्वात प्रगत आहे. २०१४ नंतर राज्यात पहिल्यांदा वॉर रूम संकल्पनेद्वारे विविध पायाभूत सुविधा विकास प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यात आले. यामध्ये तंत्रज्ञानाची मोठी मदत झाल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधांसमवेत तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे, राज्यात जल संवर्धन व संसाधन तसेच कृषी क्षेत्रातही अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीने आमूलाग्र परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन सातत्याने काम करत आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस मुलाखतीत पुढे म्हणाले की, आगामी ५ वर्षांत महाराष्ट्र सरकार तीन मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. यात वाढवण बंदर हा प्रकल्प मुंबईच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडविणारा आहे. हे बंदर सध्याच्या जे.एन.पी.टी. बंदरापेक्षा तीनपट मोठे असून, २० मीटर खोल असल्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजे येथे थांबू शकतील. भारताला जागतिक सागरी व्यापारात महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा हा बंदर प्रकल्प असेल. त्याच बरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व नव्या स्मार्ट सिटीच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करणार आहे. हे विमानतळ पूर्ण झाल्यावर आजूबाजूला एक नवीन व्यापारी आणि तंत्रज्ञान केंद्र विकसित केले जाणार आहे. ही नवी शहरे मुंबईच्या तुलनेत तीनपट मोठी असतील आणि उद्योगांसाठी उत्तम संधी उपलब्ध करतील, असेही त्यांनी सांगितले.

सदर मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, नवी मुंबईसह राज्यभरात माहिती तंत्रज्ञान तसेच एआय क्षेत्रात असलेल्या संधींबाबत विस्तृत माहिती दिली. मुंबई महानगर क्षेत्रात राज्य शासनाद्वारे सुरु असलेली पायाभूत सुविधा विकासकामे यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात असून, यामुळे हा संपूर्ण भाग ‘ग्लोबल बिजनेस मॅग्नेट’ म्हणून उदयास येत आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तंत्रज्ञान व एआयच्या वाढत्या उपयोगामुळे सायबर गुन्हेगारीही वाढत आहे, यासंदर्भात राज्य शासनाने नवी मुंबई येथे सायबर गुन्हेगारीच्या संपूर्ण परिसंस्थेला आळा घालण्यासाठी, वेगळे आयुक्तालय निर्माण केले असून, सर्व बँका, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यांना या यंत्रणेशी जोडले असल्याने, आता कोणत्याही आर्थिक फसवणुकीवर तत्काळ कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एम.एम.आर.डी.ए. आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. आपले सरकार व्हॉट्सअँप चॅटबॉट संदर्भात माहिती तंत्रज्ञान विभाग आणि META यांच्यामध्ये तसेच कौशल, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि TEAM सोबत नॉलेज AI हब संदर्भात सामंजस्य करार झाला. तसेच राज्यात व मुंबईत उद्योजकतेला चालना देण्यासाठी लवकरच मुंबईत ‘म्युझियम ऑफ इंट्राप्रेन्योरशिप’ स्थापन केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार, माहिती-तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील उद्योजक, ‘मुंबई टेक वीक २०२५’ कार्यक्रमाचे आयोजक, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Jan Sangharsh News
Author: Jan Sangharsh News

जन संघर्ष न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें