जनसंघर्ष न्युज नेटवर्क
पुणे,३० : रेशन कार्डधारकांसाठी केंद्र सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असून, या निर्णयामुळे धान्य वितरणातील विषमता दूर होण्याची शक्यता आहे. अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने रेशन वाटपाच्या नियमांमध्ये ऐतिहासिक बदल करण्याची तयारी सुरू केली आहे.
सध्या अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सदस्यसंख्या कितीही असो, दरमहा 35 किलो धान्य मिळते. मात्र, या प्रणालीत काही लहान कुटुंबांना गरजेपेक्षा जास्त आणि मोठ्या कुटुंबांना अपुरे धान्य मिळत असल्याची तक्रार अनेक वर्षांपासून होती. आता केंद्र सरकार या असमानतेवर उपाय म्हणून “प्रति व्यक्ती आधारावर” धान्य वितरण करण्याची योजना राबवणार आहे.
अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, नव्या निर्णयानुसार प्रत्येक सदस्याला दरमहा ७.५ किलो धान्य देण्याची तरतूद असणार आहे. त्यामुळे चार किंवा त्यापेक्षा कमी सदस्य असलेल्या कुटुंबांचे धान्य थोडे कमी होईल, तर पाच किंवा अधिक सदस्य असलेल्या कुटुंबांना जास्त धान्याचा लाभ मिळेल.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार सध्या देशात १.७१ कोटी अंत्योदय रेशन कार्डधारक कुटुंबे आहेत. यांपैकी बहुतांश कुटुंबात पाच किंवा त्यापेक्षा कमी सदस्य आहेत. नव्या प्रणालीची अंमलबजावणी पुढील वर्षी मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
या निर्णयामुळे सरकारला धान्य बचतीसह ते अधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचवता येईल, असा दावा अन्न मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सामान्य रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्य मिळते, मात्र नव्या नियमांनुसार अंत्योदय धारकांना प्रति सदस्य साडेसात किलो धान्य मिळणार असल्याने या वर्गाला तुलनेने अधिक फायदा होणार आहे.
सरकारच्या या नव्या उपक्रमामुळे रेशन वितरणात पारदर्शकता वाढेल, तर दीर्घकाळ प्रलंबित असलेली धान्य वाटपातील असमानता दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 5,305









