जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.१ : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी परिसरातील जंगलात निर्माण झालेल्या तीव्र जलटंचाईच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने अखेर तातडीने उपाययोजना राबवत पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवर उचललेल्या प्रश्नांची आणि जनसंघर्ष न्यूजमध्ये सकाळी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र वनविभागने जलपुरवठा मोहीम हाती घेतल्याने जंगलातील वन्यजीवांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना काळवीट, हरिण, ससे, तरस, लांडगे, निलगाय तसेच विविध पक्षी प्रजाती पाण्याअभावी भटकंती करत असल्याचे गंभीर चित्र समोर आले होते. जंगलातील जलकुंभ व पाणवठे कोरडे पडल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या तातडीच्या जलपुरवठ्यामुळे परिस्थितीत दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी दरवर्षी उन्हाळ्यात भासणाऱ्या पाण्याच्या कमतरतेकडे लक्ष वेधत कायमस्वरूपी जलव्यवस्थेची मागणी केली होती. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत कोरड्या पडलेल्या पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध करून दिल्याने संभाव्य मानवी-वन्यजीव संघर्षाचा धोका कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
वन्यजीव तज्ज्ञांनी उन्हाळ्यातील जलव्यवस्थापनाला संवर्धनासाठी अत्यावश्यक मानत पाणवठ्यांची नियमित स्वच्छता, दुरुस्ती, तसेच सौरऊर्जेवर आधारित जलपुरवठा यंत्रणा उभारण्याची गरज अधोरेखित केली आहे. प्रशासनानेही जलस्रोतांची सातत्यपूर्ण देखभाल आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचे स्वागत करत जंगलातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. इंदापूर तालुक्यातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरत आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 85,038









