जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
मुंबई,ता.५ : नसरापूर येथील संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित प्रकरणात कठोर आणि जलद कारवाई करण्याची मागणी करत सविस्तर निवेदन सादर केले.
या निवेदनामध्ये थोपटे यांनी गुन्ह्याची गंभीरता अधोरेखित करत आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची मागणी केली. विशेषतः ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, असा ठाम आग्रह त्यांनी धरला. न्यायालयीन प्रक्रियेत कोणतीही ढिलाई न होता खटला जलदगतीने चालवावा, अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
नसरापूरमधील या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा रोष वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही थोपटे यांनी दिला.
दरम्यान, मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 100,100









