जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
सातारा :-पुणे व सातारा अँटीकरप्शन विभागाच्या वतीने संयुक्तपणे साताऱ्यामध्ये मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे, त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू केली आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधिशांसह तीन जनांना रंगेहात पकडल्यानंतर जिल्हा न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे, पोलीस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना हि सर्वसामान्यांची असते. मात्र, चक्क न्यायाधीश महोदयचं लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्यांकडून उपस्थित झाला आहे. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट जिल्हा न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच लाचखोरीत अडकल्याने यामुळे सर्व जिल्हयात खळबळ उडाली आहे.
फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या लाचखोरीच्या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून पुणे व सातारा अँटीकरप्शन च्या पोलिसांनी या सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवर या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह