जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
इंदापूर, ता.१९ | इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी गावातील जाणता राजा चौक ते निरगुडे रोड (ढाळेवस्ती) हा रस्ता अक्षरशः खड्डेमय झाला असून ग्रामस्थांना रोजच्या वापरातील रस्त्यावरून जाताना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. दुचाकी, चारचाकीच नव्हे तर शेतमाल वाहतुकीसाठी जाणाऱ्या ट्रॅक्टर व इतर वाहनांदेखील या दुरावस्थेच्या रस्त्यामुळे अक्षरशः तारेवरची कसरत सहन करावी लागत आहे.
गावातील ग्रामस्थांचे स्पष्ट आरोप आहे की, स्थानिक गावपुढाऱ्यांनी मुद्दाम या रस्त्याला निधी येऊ नये म्हणून अडथळे निर्माण केले आहेत. सार्वजनिक कामांमध्ये हस्तक्षेप करून ग्रामपुढारी केवळ वैयक्तिक स्वार्थ जपतात, मात्र सामान्य नागरिकांचे हाल पाहण्याची मानसिकता त्यांच्यात नाही, असा थेट आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तर या मार्गावरून जाणे म्हणजे अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करणे होय. तरी देखील अनेक वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधी डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामस्थांनी आता कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे थेट सवाल केला आहे – “आमच्या गावातील या रस्त्याकडे आपण लक्ष देणार आहात का? गावपुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाला आळा घालणार आहात का?” असा संतप्त स्वर ग्रामस्थांतून उमटला आहे.
गावातील नागरिकांच्या एकमुखी मागणीवरून हे स्पष्ट झाले आहे की, जर तातडीने रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले नाही तर, ग्रामस्थांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र सध्यातरी निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रश्नावर आता राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि स्थानिक प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हणजेच,म्हसोबाचीवाडी तील जाणता राजा चौक ते निरगुडे रोड हा केवळ रस्ता दुरुस्तीचा प्रश्न राहिलेला नसून, तो आता ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा आणि जनप्रतिनिधींच्या जबाबदारीचा कस लागणारा प्रश्न निर्माण झाला आहे.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 264










