जनसंघर्ष न्युज नेटवर्क
मुंबई, ता.१५ : राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असून, केंद्र सरकारची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःच्या स्तरावर मदत करणार आहे, अशी माहिती कृषिमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली.
कृषिमंत्र्यांनी सांगितले की, सध्या युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १ कोटी ८४ लाख एकर शेती बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले असून, काही ठिकाणी काम अंतिम टप्प्यात आहे. “शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठे आहे; त्यामुळे मदत देताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घेतली जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. या पॅकेज ला महसूल, ग्रामविकास आणि कृषी विभागाकडून अंतिम स्वरूप दिले जात आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३ शासकीय निर्णय (जी.आर.) जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
“प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळेल. मदत थोडी उशिरा मिळाली तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा; सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असे आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले. केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विरोधकांवर टीका करताना कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे की, “ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे.” राज्य सरकार दिवाळीपूर्वी मदत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, “शेतकऱ्यांना उभे करणे हीच आमची प्राथमिकता आहे,” असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 125











