जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
इंदापूर, ता.१७ – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मसोबाची वाडी ग्रामपंचायत आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर निरगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ॲनिमिया मुक्त गाव’ अभियान व सर्व रोगनिदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. 17 नोव्हेंबर 2025 रोजी घेतलेल्या या शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १४५ नागरिकांनी विविध तपासण्या करून घेतल्या.
शिबिरात महिलांपासून पुरुष आणि बालकांपर्यंत सर्वांसाठी मूलभूत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. हिमोग्लोबिनची कमतरता ओळखणे, रक्तदाब व मधुमेह तपासणीसह डोळ्यांची तपासणी, आयुष्मान भारत कार्ड या अत्यावश्यक सेवांचा लाभ नागरिकांना एका ठिकाणी उपलब्ध झाला.
तपासण्यांचा तपशील पुढीलप्रमाणे—
• संपूर्ण रक्त तपासणी: 110
• हिमोग्लोबिन तपासणी: 85
• मधुमेह तपासणी: 75
• रक्तदाब तपासणी: 118
• डोळे तपासणी: 83
• आयुष्मान भारत कार्ड: 16
• आभा कार्ड: 26
तसेच एकल महिलांचे बालसंगोपन अर्जही या ठिकाणी स्वीकारण्यात आले.
मा. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन सुरळीत पार पडले. कार्यक्रमासाठी गावचे सरपंच राजेंद्र राऊत, उपसरपंच सविता मराळ, ग्रामपंचायत सदस्य रमेश चांदगुडे, राणीताई पवार, सुप्रिया चांदगुडे, माधुरी चांदगुडे, तसेच मोहन दाभाडे, प्रमोद खंडाळे, पोलीस पाटील तुषार झेंडे पाटील, तंटामुक्त अध्यक्ष लालसो चांदगुडे, प्रगतिशील शेतकरी मनोज चांदगुडे, आण्णासो चांदगुडे, पत्रकार पल्लवी चांदगुडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल कारंडे, आरोग्य सहायिका जनाबाई भिटे, समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका कुलकर्णी, तसेच सर्व आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी शिबिरात मोलाची सेवा बजावली. ग्रामपंचायत अधिकारी सोनाली गवळी यांनी शिबिराची माहिती दिली.
ग्रामस्थांच्या मोठ्या सहभागामुळे उपक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. ॲनिमिया मुक्त गाव अभियानामुळे गावाच्या एकूण आरोग्य उन्नतीस मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास ग्रामपंचायतीने व्यक्त केला.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह










