जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे, ता.५ : – “मराठा आणि ओबीसी समाजातील मतभेद मिटले, तरच महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या राजकारणाकडे परत येईल. अन्यथा आपण अजून काही दशके जातीपातीच्या राजकारणात अडकून विकासापासून कोसो दूर जाऊ,” असे प्रतिपादन ॲड. योगेश केदार यांनी केले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी अलीकडे घेतलेल्या प्रॅक्टिकल भूमिकेचे स्वागत करताना केदार म्हणाले, “तायवाडे साहेबांशी माझा नेहमी संपर्क असतो. नागपूरात त्यांच्या घरी आरक्षण विषयावर सविस्तर चर्चा झाली. याआधी त्यांच्या कार्यालयात भेट झाल्यानंतर त्यांनी स्वतःहून संध्याकाळी घरी बोलावून सन्मान केला. ही भेट ओबीसी नेते सोमनाथ काशिद यांच्या पुढाकाराने झाली होती.”
राज्याच्या सामाजिक–राजकीय वातावरणात संवादाची गरज असल्याचे सांगताना केदार म्हणाले, “मी सभांमधून आक्रमक भाषण करतो, पण वैचारिक विरोधक शत्रू नाहीत, हा माझा ठाम विश्वास आहे. भविष्यात जेव्हा संवाद होईल, तेव्हा एकमेकांविषयी मनं कलुषित होऊ नयेत, ही माझी भूमिका आहे. लोकशाही मूल्यांवर माझा पूर्ण विश्वास असून चर्चेतून प्रश्न सोडवण्यावर माझा भर असतो.”
ते पुढे म्हणाले, “राज्याच्या इतिहासात नव्वदीच्या दशकात काही राजकीय चुका झाल्या आहेत; त्या दुरुस्त करण्याची हीच वेळ आहे. मराठा–ओबीसी प्रश्नावर नेहमीच मी संवादाचा पूल बांधण्याचा प्रयत्न केला आहे. वयाने लहान असूनही दोन्ही समाजांमध्ये माझ्याबद्दल विश्वास आहे, हा माझा अभिमान आहे.”
समाजातील ऐक्याचा संदर्भ देत केदार म्हणाले, “मराठा आणि ओबीसी हे एकमेकांविरोधात उभे राहावेत असे अनेक प्रयत्न झाले, पण हजारो वर्षांचा आपला अनुबंध इतका मजबूत आहे की कुणाचं तितकंसं फावले नाही. दोन्ही समाजांमध्ये संवाद टिकून राहिला, तरच महाराष्ट्रातील शांतता आणि प्रगती कायम राहील.”
शेवटी त्यांनी आवाहन केले, “आजच्या तरुण पिढीने जातीच्या पलीकडे जाऊन बेरोजगारी, शेती, शिक्षण या प्रश्नांवर चर्चा करावी. समाजांना भिडवण्याऐवजी जोडण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करायला हवं.”
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 89










