जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणेः ईपीएफओ पेन्शन निधी | सरकारच्या विविध योजनांतर्गत खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जातात. खाजगी नोकरीतील कर्मचाऱ्यांसाठी सर्व निर्णय ईपीएफओ म्हणजेच ‘कर्मचारी भविष्य निधी संघटना’ अंतर्गत घेतले जातात. आज आपण ईपीएफ पेन्शनविषयी सविस्तर वृत्त पाहणार आहोत.
वयाची अट काय आहे ?
ईपीएओ योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ वर्षानंतर पेन्शन सुरू होते. यात कर्मचाऱ्यांचे आणि कंपनीचे योगदान दोघांचे मिळून ईपीएफ खात्यात जमा केले जाते. महत्त्वाचे म्हणजे, ज्या कर्मचाऱ्याने खाजगी कंपनीत १० किंवा त्याहून अधिक वर्षे काम केले असेल तो ईपीएफओ अंतर्गत पेन्शनसाठी पात्र ठरतो. आज आपण जाणून घेणार आहोत की, २५००० रुपये पगार असल्यास दरमहा किती पेन्शन मिळू शकते ?
पेन्शनसाठी कंपनीचे योगदान काय आहे ?
कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल हे त्यांच्या कामाच्या कालावधीवर अवलंबून असते. तसेच, कर्मचारी ५८ वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. ईपीएफ सदस्याच्या पगाराच्या १२% त्याच्या ईपीएफ खात्यात जमा होतो आणि तितकीच रक्कम कंपनीकडूनही जमा होते. ईपीएस चा हिस्सा ८.३३% तर ३.६७% ईपीएफ खात्यात जमा केला जातो.
१० वर्षांची सेवा आणि पेन्शन पात्र पगार २५००० रुपये असल्यास, महिन्याला किती पेन्शन मिळणार ?
ईपीएफ मासिक पेन्शन कॅल्क्युलेशन साठी एक खास फॉर्म्युला वापरला जातो, जो (सरासरी पगार x नोकरीचा कालावधी / ७०) असा आहे. कर्मचाऱ्याचा शेवटच्या ६० महिन्यांचा म्हणजे ५ वर्षांचा सरासरी पगार घेतला जातो.
या सूत्रानुसार, कर्मचाऱ्याने आपले १० वर्षाचे कामाचे योगदान दिले आणि शेवटचा पगार २५००० रुपये असल्यास, त्याला वयाच्या ५८ वर्षापासून ३५७१ रुपये मासिक पेन्शन मिळणे सुरू होईल. कोणताही कर्मचारी सूत्रानुसार सहजपणे आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनची गणना करू शकतो.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह