जनसंघर्ष न्युज नेटवर्क/ बातमीसाठी संपर्क-७५८८६२२३६३
शिरवळ, (ता.खंडाळा), ता.४ : नसरापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शिरवळ शहरातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत शांततापूर्ण पद्धतीने निषेध नोंदवला. या वेळी नागरिकांनी पीडितेला श्रद्धांजली अर्पण करत आरोपीविरोधात तातडीने कठोर कारवाईची मागणी केली.
घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून चौकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण परिसरात पोलीस तैनात असल्याने कार्यक्रम शांततेत पार पडला.
या निषेध आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. नागरिकांनी घटनेविरोधात आपली भावना व्यक्त केली. परिसरात काही काळ गंभीर वातावरण निर्माण झाले होते. उपस्थितांनी दोन मिनिटे शांतता पाळून पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात संबंधित आरोपीविरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी महिला प्रतिनिधींनी समाजातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर चिंता व्यक्त केली. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तपास प्रक्रियेत अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
मान्यवरांनी प्रशासनाने या प्रकरणात तातडीने आणि पारदर्शक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. दोषींना वेळेत शिक्षा झाल्यासच कायद्यावरील विश्वास दृढ राहील, असेही त्यांनी नमूद केले.
या निषेधातून शिरवळकरांनी शांततेच्या मार्गाने एकजूट दाखवत न्यायासाठीचा आवाज बुलंद केला.
Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह
Post Views: 100,116









