जनसंघर्ष न्यूज नेटवर्क
पुणे – राज्यातील खरीप हंगाम २०२५ साठी शेतकऱ्यांनी स्वतः मोबाईलद्वारे पीक नोंदणी प्रक्रिया सुरू केली असून, महसूल विभागाने यंदा ‘ई-पीक पाहणी’ अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट डिजिटल नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. १ ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून, १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत ती सुरू राहणार आहे.
राज्यात १५ ऑगस्ट २०२१ पासून महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी उपक्रमाची अंमलबजावणी होत असून, आता सुधारित ‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ प्रणाली रब्बी २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. याच अंतर्गत खरीप हंगाम २०२५ साठी ‘ई-पीक पाहणी’ अॅपचे नविन व्हर्जन ४.०.० गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी ते त्वरित अपडेट करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या ७/१२ उताऱ्यावर असलेल्या पिकांची माहिती ई-पीक पाहणी अॅपमधून नोंदवायची आहे. ही प्रक्रिया शक्य तितकी स्वतः शेतकऱ्यांनीच पूर्ण करावी, जेणेकरून खरी माहिती शासनाकडे थेट पोहोचेल आणि त्यातून शासकीय योजनांचा लाभ अचूक मिळू शकेल, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
या प्रक्रियेसाठी शेतकरी स्तरावरील पीक पाहणी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत पार पडणार असून, सहाय्यक स्तरावरील पाहणी १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान केली जाणार आहे. डिजिटल माध्यमातून पारदर्शकता व अचूकता वाढावी यासाठी ही पद्धत प्रभावी ठरत आहे.
पीक पाहणी करताना अडचणी आल्यास प्रत्येक गावासाठी नेमण्यात आलेले सहाय्यक पहिले दिवसापासून मदतीसाठी उपलब्ध असतील. मात्र शेतकऱ्यांनी सहाय्यकांवर अवलंबून न राहता यंदाची डिजिटल प्रक्रिया आत्मविश्वासाने पूर्ण करावी, असा संदेश महसूल विभागाकडून देण्यात आला आहे.

Author: Jan Sangharsh News
जन संघर्ष न्यूज लाईव्ह